*पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात ४३७ अर्जदारांशी थेट संवाद साधला*
*“ज्या दिवशी एकही अर्ज येणार नाही, तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा”* –
*....पालकमंत्री गणेश नाईक*
पालघर | दि. १० फेब्रुवारी: जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या समस्या, अडचणी सुटलेल्या असतील आणि आम्ही जनता दरबार आयोजित करून एकही अर्जदार आला असेल तर तो दिवस माझ्या साठी आनंदाचा असेल असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या 6 व्या जनता दरबारात ४३७ अर्जदारांशी पालकमंत्री गणेश नाईक यांनी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या .
नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश देत पालकमंत्र्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर समाधान व्यक्त केले.
या जनता दरबारात सर्वश्री आमदार राजेंद्र गावित, स्नेहा दुबे-पंडीत, राजन नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. निकम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी रविंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
“माझी इच्छा आहे की हा जनता दरबार कधी तरी थांबला पाहिजे. ज्या दिवशी जनता दरबारात एकही अर्ज येणार नाही, त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने पालकमंत्री म्हणून समाधानी असेन. याचा अर्थ प्रशासनाने लोकांची कामे वेळेआधीच पूर्ण केली आहेत.” असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक अवघ्या पाच दिवसांपूर्वीच पार पडली असतानाही पुन्हा जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या जात असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नमूद केले. आजचे प्रशासन अधिक गतिमान, जबाबदार आणि उत्तरदायी झाले असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले,
“ज्याच्याकडे नियोजन नाही, डायरी नाही, अशा माणसावर मी विश्वास ठेवत नाही. प्रत्येकाने आपल्या कामाचे नीट नियोजन करावे, निवडणुकांपासून दैनंदिन कामांपर्यंत सर्व नोंदी डायरीत ठेवा.”
अधिकाऱ्यांनी इंटरनेटचा प्रभावी वापर करावा, त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील अधिकारी यांना दिले. विशेषतः पोलीस विभागाने अधिक शिस्तबद्ध आणि संवेदनशीलपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले,
“उद्यासाठी ढकललेले काम आज करा आणि आजचे काम आत्ताच करा. हीच कार्यसंस्कृती प्रशासनात रुजली पाहिजे.”
समाजसेवेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गोरगरिबांची कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे.

