विरार मध्ये दोन तरूणांची सामूहिक हत्या की आत्महत्या ? चित्र अस्पष्ट
हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप
विरार पश्चिमेच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून पडून दोन तरुांचा मृत्यू झाला आहे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. प्रथम दृष्ट्या ही घटना आत्महत्या असल्याचे बोलले जात होते मात्र त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेली कुठलीही चिठ्ठी पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. दरम्यान, मयत मुलाच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
विराच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुऱक्षारक्षकाला जोरदार पडल्याचा आवाज आला. दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनास्थळी अर्नाळा सागरी पोलिसांनी धाव घेतली. मृत तरूणांकडे मोबाईल फोन नसल्याने त्यांनी ओळख पटविण्यात पोलिसांसमोर अडचणी येत होत्या. हे दोन विद्यार्थी ज्या दुचाकीवरून आले होते त्या दुचाकीवर असणाऱ्या क्रमांक पट्टीच्या आधारे पोलिसांनी मुलांची ओळख पटवली. शाम घोरई (२०) आणि आदित्य सिंग (२१) अशी या मुलांचे नावे आहेत. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदासाठी पाठविण्यात आले आहेत.
ही दोन्ही मुले नालासोपारा येथील आचोळे परिसरात रहात होती. ते दोघे नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात होते. आम्ही याबाबत तपास करत आहोत, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत आदित्यचे वडिल राज सिंग यांनी केला आहे.
सोमवारी दुपारी दोन मित्र आमच्या घरी आले होते. माझा मुलगा राज सिंग त्यांच्यासोबत वृंदावन उद्यानात जाऊन येतो असं सांगून गेला होता. १० मिनिटे झाली तरी तो परतला नाही. आम्ही शोध घेतल्यानंतर पोलीस चौकीत तक्रार दिली होती, असे सिंग यांनी सांगितले. तीन मुले एकत्र गेली होती. दोघांनी आत्महत्या केली. ही हत्याच असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी तिस-या मुलाकडे आम्ही चौकशी करत आहोत. संपूर्ण प्रकऱणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ- ३) सुहास बावचे यांनी सांगितले.